Posts

Showing posts from 2012

I love you

काल आदित्यने त्याच्या वर्गातल्या आर्याला 'I love you ' म्हणलं. मग  ती त्याला म्हणाली की माझं तुझ्याशी प्रेम आहे. आणि ते हे एकमेकांशी उभं  राहून बोलत असताना अदितीने ऐकलं  आणि सगळ्यांना सांगितलं. आणि मग  सगळे खूप हसले.   तुम्हाला काय वाटतं. हा किस्सा काय वयाच्या मुलांचा असेल?  . . . मला वाटतंय की माझ्या काळातला असला असता तर साधारण किमान वय १२-१३ तरी असले असते. अलीकडे ते हळू हळू खाली येत आहे. पण हा किस्सा माझ्या धाकट्या कन्येच्या वर्गात घडला. वय किती तर फक्त वर्षे ५!!! आज सकाळी मी काम करत असताना तिने मला सांगितलं  की तिच्या वर्गात काल एक गंमत  झाली आणि तिने वर दिलेली घटना सांगितली. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.  त्याला कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेचना.  भविष्यात काय काय प्रकारचे प्रसंग येणार आहेत याची ही मला नांदी वाटली. प्रश्न उरतो की असे प्रसंग हाताळायचे कसे. आहे काही उत्तर तुमच्याकडे?

शिक्षक दिन विशेष - देसाई सर

मी सहावीत असताना पुण्यात आले. आमची शाळा मुला-मुलींची असली तरी सकाळची शिफ्ट मुलींची आणि दुपारची मुलांची असं होतं. त्याप्रमाणे लागणारा शिक्षक वर्ग पण असायचा. सकाळी शिक्षिका जास्त. तर दुपारी मुलांना हाताळू शकतील असेल शिक्षक जास्त. असो. मग सातवीत गेल्यावर आमचा मुला-मुलींचा एकत्र असा वर्ग झाला. तथाकथित हुशार मुलांची तुकडी. आणि शाळा झाली दुपारची. तेव्हा आम्हाला पीटीला देसाई सर म्हणून आले. ते नक्कीच साचेबद्ध शिक्षकापेक्षा वेगळे होते. पीटीचे सर असल्याने कडक तर होतेच पण त्या बरोबर मुलांमध्ये मिसळून जायची कला त्यांच्याकडे पण होती. त्यांचं वाचन भरपूर होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांनी केलेलं वाचन अथवा त्यांनी बघितलेला पिक्चर गोष्टी रुपात आमच्या पर्यंत पोहोचवता यायचं. मला अजून आठवतंय त्यांनी 'शर्थीने राज्य राखले' ह्या कादंबरीतले काही भाग आम्हाला सांगितले होते. खूप भारावून गेल्यासारखं झालं होतं. त्याच बरोबर त्यांनी आम्हाला 'फ्रॅन्केनस्टाईन' ह्या पिक्चरची गोष्ट सांगितली होती. आज विकी वर पाहिलं तर १९३१ सालचा तो पिक्चर आहे. त्यांनी तो कधी बघितला असावा काय माहित! पण त

सुविचार

आज SMS मध्ये एक छान सुविचार आला. आवडला म्हणून इथे टाकत आहे. "Meditation purifies Mind  Charity purifies Wealth   Fast purifies Body  Forgiveness purifies Relation  But only Prayer purifies Soul."

पास्ता इन टोमॅटो सॉस

Image
ही रेसिपी मी एका साप्ताहिक सकाळच्या अंकात वाचली आहे. उषा पुरोहितांची आहे. पण खालील रेसिपी माझे काही फेरफार करून केलेली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ओव्हन मध्ये बेक करायला सांगितले आहे. पण माझ्या कडे मायक्रोवेव्ह नसल्याने मी बेक केले नाहीये. असो.  सर्वात आधी मी माझ्या घरच्यांवर हा प्रयोग केला. आणि मग यशस्वी झाल्यावर परवा माझ्या मोठ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मोठ्या प्रमाणावर केला. सगळ्यांना खूप आवडला. त्यामुळे इथे त्याची कृती टाकत आहे. साहित्य: पास्ता               २०० ग्रॅम टोमॅटो               ५०० ग्रॅम  कांदा                 १  लसूण                 ४-५ पाकळ्या  गाजर                  १  मीर पूड                चवीनुसार  ऑलिव तेल          २ चमचे बटर                    १ चमचा  मीठ                     चवीनुसार इ टॅलियन सिझनिंग चवीनुसार संपूर्ण कृती तीन टप्प्यांमध्ये विभागता येते.  १.  टोमॅटो  सॉस तयार करणे. २. पास्ता पाण्यात उकळून घेणे. ३.  टोमॅटो  सॉस आणि शिजवलेला पास्ता एकत्र गरम करणे. सर्व प्रथम आपण  टोमॅटो  सॉस करायची कृती बघुयात. १. 

अर्धशतक

अरेच्चा, बघता बघता अर्धशतक गाठलं. आत्ताची ही ५१ वी पोस्ट. सुरुवात केली तेव्हा किती लिहायचं, काय लिहायचं हे काहीच ठरवलं नव्हतं. फक्त लिहायचं एवढंच मनात होतं. त्यामुळे हे अर्धशतक गाठायला किती वेळ घेतला हे खरंच महत्वाचं नाहीये. सध्या तरी लिखाण चालू राहिलेय हीच मला महत्वाची गोष्ट वाटतेय.  मी जेव्हा नुकतीच कार चालवायला शिकले होते तेव्हा वेगाचं भारी वेड होतं. (म्हणजे तसं ते पूर्णपणे गेलं नाहीये तरीही!) त्या वेगाच्या पायी इच्छित स्थळाला लवकर पोहोचत तर होते पण कित्येक क्षण काळजाचा ठोका चुकवणारे अनुभवाला यायचे. आता मात्र गाडी चालवताना प्रवास निर्धोक आणि आनंददायी होईल हे बघते.  त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये  अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजून खूप लिहायचं आहे. मन-मोकळेपणाने लिहायचे आहे. पण हा प्रवास सुसाट नसेल कदाचित पण मनाला आनंद देणारा नक्कीच असेल.

एका बेडकाची गोष्ट

माझी आधीची कंपनी सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्याने बिहेवियरल ट्रेनिंग बरीच असायची. असंच एक ट्रेनिंग केलं होतं त्यात आमच्या ट्रेनरने ही बेडकाची गोष्ट सांगितली होती. मनात कायमच्या राहिलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. ===================================================================== एकदा काही संशोधक एका बेडकावर  प्रयोग  करत होते. प्रयोग असा होता की बेडूक किती तापमानाचे गरम पाणी सहन करू शकतो. सर्व प्रथम त्यांनी पाण्याचं तापमान ९० अंश ठेवलं. म्हणजे पाणी उकळायला लागाच्या आधीचं तापमान. त्यांनी बेडकाला त्या पाण्यात टाकलं तसं त्याने टुणकन बाहेर उडी मारली. मग संशोधकांना वाटलं की हे तापमान खूप जास्त होत आहे म्हणून त्यांनी पाण्याचं तापमान बरंच कमी केलं आणि ५० अंश ठेवलं. पुन्हा बेडकाला त्यात टाकलं तर त्याने पुन्हा पाण्याबाहेर उडी मारली. पाण्याचं तापमान अजून कमी केलं. ४० अंश ठेवलं. पण ते तापमान पण बेडकाला सहन झालं नाही आणि त्याने बाहेर उडी मारली. मग संशोधकांनी विचार केला की बेडकाला पाण्यातच ठेवायचे आणि हळू-हळू पाण्याचे तापमान वाढवायचे. म्हणजे त्यांना नक्की कळेल की कुठल्या तापमानाला बेडू

निर्लेप

काल  'सकाळ' मध्ये मुक्तपीठ सदरातला लेख वाचला. तो एका स्त्रीरोगतज्ज्ञाने लिहिला होता. त्याचा सारांश असा होता की एक  मुलगी   गरोदर राहिल्यानंतर त्यांच्याकडे येत होती. त्या मुलीचे वागणे अतिशय संयत आणि तिचा नवरा एकूण कमी बोलणे, भावना कमी व्यक्त करणे हे सदरातला होता. त्या डॉक्टरना तिच्या नवर्याच्या वागण्याबाबत आश्चर्य वाटत होते. त्यात त्या मुलीची तारीख जवळ यायला लागल्यावर ती तिच्या आई सोबत येऊ लागली. तेव्हाही त्या डॉक्टरना असेच वाटले की त्याने (नवर्याने) अजूनच अंग काढून घेतले.  यथावकाश त्या मुलीला प्रसूतिवेदना सुरु झाल्या आणि ती त्या अत्यंत धीराने सोसत होती. कळ आल्यावर केवळ तोंड थोडे वाकडे होत असे. पण  ती  कायम कसला तरी जप करत होती. तिला एक मुलगा झाला. बालरोगतज्ज्ञांनी त्याला तपासले आणि बाळाला घरच्यांच्या सुपूर्द केले. बाळ झाल्यावर त्या नवर्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित झळकले. परंतु दुर्दैवाने ते बाळ दुसर्याच दिवशी काही कारणांनी मृत्युमुखी पडले. बाळाच्या आईला धक्का बसू नये म्हणून तिला बाळ सिरीयस हे असे सांगितले आणि बाळाच्या बाबांना मात्र बोलावून घेऊन सत्यपरिस्थितीची कल्

हिरव्या रंगाचा चष्मा

ही गोष्ट एकदा शाळेत असताना एका मैत्रिणीने सांगितली होती. त्या मैत्रिणीशी काहीच संपर्क राहिला नाही. पण ह्या गोष्टीच्या रूपाने तिची आठवण मात्र मनावर कोरली गेली. ========================================================= एक आटपाट नगर होतं. त्या नगराच्या राजाला एक सुकुमार मुलगा होता. परंतु अत्यंत गुणी अश्या ह्या राजपुत्राला अचानक एका विचित्र आजाराने पछाडते. त्या राजपुत्राच्या दृष्टीस जर हिरव्या रंगा व्यतिरिक्त जर कुठला दुसरा रंग पडला तर तो सडकून आजारी पडत असतो. झालं! आपल्या पुत्रप्रेमापोटी तो राजा फतवा काढतो की राज्यात सर्वत्र हिरवाच रंग दिसेल अश्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे पूर्ण राजवाड्यात हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरते. अवती-भवती सर्वत्र केवळ हिरवाई. जमीन असेल तिथे हिरवे गालिचे आच्छादलेले असतात. पण राजा हा केवळ एक माणूसच असल्याने पूर्ण जगात तो हिरवाई आणूच शकत नव्हता. आकाशाचा निळा रंग तो झाकू शकत नव्हता.  पुन्हा राजा चिंताग्रस्त झाला. काय करावं सुचेना. तेवढ्यात त्याच्या राज्यात एक साधू-पुरुष हिंडत फिरत आले. त्यांना सर्वत्र दिसणार्या हिरव्या रंगाचे गूढ कळेना. शेवटी

हत्ती आणि दोरी

ही गोष्ट मला बर्याच दिवसांपूर्वी एका ईमेल मध्ये आली होती. मनाला खूप भावली म्हणून इथे देत आहे. ======================================================================= एके दिवशी एक माणूस एका गावात चक्कर मारत असतो. तर त्याला तिथे एक विलक्षण दृश्य दिसतं. एक भला-मोठ्ठा हत्ती एका खांबापाशी उभा असतो. आणि थोडं जवळ जाऊन पाहता त्याला असं दिसतं की त्या हत्तीच्या पायाला एक दोरी बांधली आहे आणि तिचं दुसरं टोक त्या खांबाला बांधलेलं आहे.  त्या माणसाला प्रचंड आश्चर्य वाटतं की एवढा अजस्त्र हत्ती ती सुतळी तोडून तिथून सुटायचा प्रयत्न न करता तिथेच बंधकासारखा उभा आहे.   तो माणूस त्या हत्तीच्या मालकाला शोधतो आणि त्याला विचारतो की एवढा मोठा हत्ती केवळ पायाला बांधलेल्या दोरीने कसा काय एके जागी बदला गेला आहे? तेव्हा तो मालक सांगतो की तो हत्ती जेव्हा एक लहान पिल्लू होता तेव्हाच त्याच्या पायाला अशी दोरी बांधलेली. त्यावेळेस त्याने ती दोरी तोडून सुटायचा प्रयत्न केला पण त्याची शक्ती कमी पडल्याने सुटू शकला नाही.  आता त्या हत्तीच्या मनात ती दोरी न तुटण्याची भावना ठाम झालेली असल्याने तो ती तोडायचा प्रयत्

कोरडे पाषाण

माझी मोठी मुलगी जरा चिडखोर आहे. म्हणजे ती तिच्यासमोर घडलेली, बोललेली प्रत्येक गोष्ट मनावर घेते. आणि मग चिडणे, रडणे, रुसून बसणे चालू होते. आणि मग अश्या प्रसंगी कायम तिची समजूत काढावी लागते.  अश्या वेळेस मी तिला कायम सांगत असते की समोरची व्यक्ती काय बोलते किंवा कशी वागते हे आपल्या हातात अजिबात नसते. पण आपण ह्या सर्वांना काय प्रतिक्रिया द्यायची हे नक्कीच आपल्या हातात असते. (मला वाटतंय की बहुतेक सगळ्यांना ती एक मेल नक्कीच आली असेल की आपल्याला होणारं सुख किंवा दुःख ह्यासाठी सभोवतीची परिस्थिती केवळ १०% कारणीभूत असते आणि उरलेले ९०% आपण परीस्थितीला काय प्रतिक्रिया देतो हे!) पण काय आहे न की अजून ती लहान आहे त्यामुळे मी सारखं सांगत राहते आणि ती पुढच्या वेळेस तिला जसं वागायचं तसं वागत राहते. असो. तर आज ह्या गोष्टीची आठवण यायचा कारण म्हणजे. सकाळी अशीच एक घटना घडली. कोणी तरी काही तरी बोललेले मला कळले आणि मला खूप दुःख झालं. गंमत कशी आहे ना की कोणी तरी काही तरी कधी तरी बोलून गेलंय जे मला आज कळलंय. म्हणजे माझा अजिबातच कंट्रोल नाही. तरी मी वाईट वाटून घेत बसले. आता मग ह्याला काय म्हणायचं! 

Rosy picture

Image
मी माझी जुनी कंपनी सोडली आणि नवीन जागी रुजू झाले. आता त्याला सुद्धा जवळ-जवळ एक महिना होत आला. पण आधीच्या ठिकाणी मी साडेसहा वर्षे होते त्यामुळे खूप जास्त गुंतले होते.  आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिथला अनुभव एखाद्या 'Rosy picture' सारखा वाटतो. केवळ चांगल्या आठवणीच दिसतात. म्हणून हे शीर्षक. (मी विचार करत होते की आपला ब्लॉग मराठी आणि शीर्षक मात्र इंग्रजी देणं कितपत योग्य! पण मग मला चांगला मराठी प्रतिशब्द सुचला नाही. मग विचार केला की भाषा ही मनातल्या भावना दुसर्यापर्यंत पोहोचवायचं माध्यम. त्यामुळे उद्दिष्ट महत्वाचं आणि माध्यम दुय्यम.) असो. पुन्हा विचार करत होते की तिथल्या आठवणी म्हणजे चांगल्या आणि वाईट अनुभवांचं मिश्रण. म्हणजे  'Rosy picture' मध्ये काटे पण असतात पण दिसत नाहीत. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालंय. फक्त चांगल्या आठवणींचा गंध येतो आणि काटे काही सलत नाहीयेत. टीप: प्रकाशचित्र इंटरनेटवरून साभार.

सर्दीसाठी एक घरगुती उपाय

सर्दी हा माझ्या घरचा रेसिडेंट आजार आहे. वर्षभरातून घरात कोण न कोणाला सर्दी असतेच. त्यात मला आणि माझ्या मोठ्या मुलीला अशी सर्दी होते की जी बाहेर वाहती नसते. त्यामुळे डोकं किंवा कान ठणकणे असे प्रकार होत असतात.   अलीकडे अलीकडे मी कानात एक तेल घालण्याचा उपाय चालू केला आहे. त्यामुळे माझे आणि माझ्या मुलीचे डोके दुखणे आणि कान ठणकणे हमखास बंद होते.   १ चमचा तिळाचे तेल घेऊन कढईमध्ये गरम करायला ठेवायचे. त्यात साधारण ३-४ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. लसून साधारणपणे काळसर होईल  इतपत त्या तेलात तळायचा. हे तेल थंड होवू द्यायचे. रात्री झोपताना थंड झालेले तेल कानात प्रत्येकी साधारण २ थेंब घालावा आणि कापसाचा बोळा घालून झोपावे. सकाळपर्यंत बर्यापैकी फरक जाणवतो. (मुख्यत्वे तिळाचे तेल वापरावे कारण ते उष्ण असते. त्याबरोबरीने लसूणही उष्ण असल्याने सर्दीवर उपचार म्हणून फायदा होतो.)   आमचे फॅमिली डॉक्टर कायम हा उपाय सांगायचे पण आधी कधी अमलात आणला नव्हता. नंतर आईने पण हाच उपाय सुचवल्यावर करून बघितला. आणि त्याची प्रचीती आल्यावर आता बर्यापैकी नियमित अमलात आणते.   सूचना: मी काही डॉक्टर नाही.

माझ्या कन्येचा ब्लॉग

माझ्या कन्येचा ब्लॉग चालू केला आहे. केवळ माझा आळशीपणा म्हणून त्यावर काही पोस्ट केले नव्हते. पण आज तिने काढलेले एक चित्र तिच्या ब्लॉगवर पोस्ट करत आहे. तिच्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे. तुम्ही अवश्य तिच्या ब्लॉगला भेट द्या. http://a-fragrant-jasmine.blogspot.com/

Sunday Syndrome

२-३ वर्षांपूर्वी 'Sunday' नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. आयेशा टाकिया, अजय देवगण, अर्शद वारसी असे कलाकार होते. मी तो पिक्चर टीव्हीवरंच बघितला होता. मला खूप आवडला. कदाचित तो नेहमीप्रमाणे एखाद्या इंग्लिश पिक्चरची कॉपी असेलसुद्धा. पण म्हणतात न की अज्ञानात सुख असतं. तसंच मी फारसे इंग्लिश पिक्चर बघत नसल्याने मला काही कळलं नाही की तो पिक्चर ओरिजिनल आहे कि कॉपी. पण मनाला आनंद देऊन गेला हे निश्चित.   तर आज ह्या पिक्चरची आठवण व्हायचं कारण म्हणजे त्या पिक्चरमध्ये जसं आयेशा टाकियाच्या आयुष्यातला फक्त एक रविवार पुसला जातो त्याप्रमाणे माझ्या ऑफिसच्या आयुष्यातले काही महिने पुसले गेले. अर्थात तिच्या आयुष्यातून एक रविवार पुसला जाण्याचं कारण वेगळं होतं आणि माझ्या आयुष्यातले काही महिने पुसले जाण्याचं कारण वेगळं होतं. तर सध्या मी एकदम नॉस्टॅल्जिक मूडमध्ये असल्याने अश्याच अधूनमधून वेगवेगळ्या आठवणी येत आहेत. त्यामुळे ही गोष्ट आठवली आणि विचार केला की एकदा कागदावर (वर्च्युअल का होईना) उतरवावी. असो.   झालं काय की माझ्या दुसर्या कन्येच्या वेळेस मी ७ महिन्यांची मॅटर्नीटी लीव्ह घेतली होती. आणि त

कॉलेजमध्ये रुजताना

आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही पुण्यात आलो. शाळेत ५ वर्षं आणि ज्युनियर कॉलेजमध्ये २ वर्षान काढल्यावर इंजिनीयरिंगसाठी बाहेर जायची वेळ आली. खरं तर मी पुण्यासारख्या मोठ्या शहरातून एका लहान गावात असलेल्या कॉलेजमध्ये चालले होते. त्यामुळे मनात इम्प्रेशन असं होतं की आपण भारी असणार. (आपण कसे ग्रेट किंवा भारी आहोत असं समजून घ्यायला आपल्याला किती आवडतं नाही!) पण ती समजूत किती चुकीची होती हे तिकडे पोहोचल्या पोहोचल्या लगेच जाणवलं. त्याचं मुख्य कारण तेव्हा मी पुण्यात राहत असले तरी १५-१६ वर्षांपूर्वी वातावरण तसं बरंच बाळबोध होतं. त्यात मी आधी मराठी माध्यम आणि नंतर सप सारख्या कॉलेजमध्ये शिकलेले होते. आणि माझ्या कॉलेजमध्ये उत्तर भारतातले आयआयटी  किंवा तत्सम कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले बहुतांशी विद्यार्थी होते. आणि जे उत्तर भारतीयांना ओळखतात त्यांना हे नक्कीच माहित असेल की त्यांच्या कडे फार पूर्वीपासून दिखावा करण्यावर फार भर असतो. माझा एक वर्ग-मित्र (उत्तर भारतीयच) होता. तो तर सांगायचा की तिकडे लोकांना भले खायला काही नसेल पण आव असा आणतील की काजू-बदाम ह्या खेरीज दुसरं ते काही खातंच नाह

एक विनोद

आई आणि बाबा त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीबरोबर भारताची क्रिकेटची मॅच बघत असतात. मैदानात राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर असतात.  आई: द्रविडला अजिबात पोट नाहीये ना! बाबा: तो काय इतर कोणत्याच खेळाडूंना पोट नाहीये.  मुलगी: म्हणजे त्याला फक्त पाठ आहे? . . . . . . ========================================================================= सदर विनोद आमच्या घरात आज सकाळी लाईव्ह घडला आहे. आम्ही जेव्हा  भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चाललेली क्रिकेटची मॅच बघत होतो तेव्हा  मी जेव्हा द्रविडला अजिबात पोट नाहीये असं म्हटलं तेव्हा हा प्रश्न माझ्या ४ वर्षांच्या मुलीला पडला. आणि त्यातून ह्या विनोदाची निर्मिती घडली. :)  

शहरात रुजताना

परवा   रविवार   सकाळच्या   - सप्तरंग पुरवणीमध्ये ' महानगरात रुजताना ' नावाचा लेख पाहिला . बहुधा वर्षभर चालणारी लेखमाला असावी .  तो लेख वाचून मला   आम्ही पुण्यात राहायला आलो ते दिवस आठवू लागले . साधारण २३ - २४ वर्षे झाली आम्हाला इथे येऊन . पुणं  अजून एक शहरंच होतं आणि त्याचं महानगरात रुपांतर झालं नव्हतं. त्यामुळे विचार केला की आपण पण आपला पुण्यात नवीन असतानाच अनुभव इथे लिहावा.  वडिलांची नोकरी बदलीची होती . त्यामुळे दर ४ वर्षांनी नवीन गावी बदली . आणि साधारण तालुक्यांच्या गावी बदली होत असे .  माझी सर्वात मोठी   बहिण साधारण   दहावीत   वगैरे   असताना   आईने   बाबांच्या   मागे   लागून   पुण्यामध्ये   घर   बुक   करायला   लावलं .  आणि   तिची   बारावी   झाल्यावर   आम्ही   आमचं   कुटुंब   पुण्यात   हलवलं .  बाबा   बदलीच्या   ठिकाणी   आणि आम्ही पुण्यात   अशी   द्विस्थळी    यात्रा होती . तेव्हा मी सहावीत गेले होते . नवीन आमच्या भागातल्या प्रथितयश शाळेत प्रवेश घेतला . आमची शाळा मुला - मुलींची असली तरी मुलींची शाळा सकाळी आणि